मित्र हा हवाच तात्पर्य कथा | मित्र हा हवाच बोधकथा | The story must be friends in Marathi
मित्र हा हवाच
प्रत्येकालाच आपल्याला कुणी तरी एक जिवाभावाचा मित्र असावा, असे वाटत असतं. नाही तरी जीवनात जमवायचे असतात, ते सद्गुणी मित्रच. ह्या मैत्रीच्या नात्यातूनच अनेकदा आपल्याला संकटात अडी-अडचर्णीत मोलाची मदत होते. असाच एक ओसाड गाव होता. त्या गावात एक भला मोठा भूकंप होऊन अनेक घरा-दारांची, मठ-मंदिरांची वाताहात झाली होती. त्या गावातली उरलीसुरली माणसं आपापलं घर गाव सोडून दूर निघून गेली होती. आता त्या उजाड अन् ओसाड गावात फक्त उंदरांचीच काय ती वस्ती शिल्लक राहिली. अनेक लहान-मोठे उंदीर तेथे आनंदानं राहू लागले. तो म्हणजे आता एक उंदरांचाच गाव झाला.
पण एक दिवस मात्र त्या उंदरांच्या स्वैर स्वच्छंद संचारावर एक भलं मोठं संकट आलं. त्या गावाजवळ एक छान सुंदर तळं होत. त्या तळ्यातलं पाणी फार गोड होतं. तळ्यात लहान-मोठी कमळंही फुलत होती.... आणि त्याच पाणवठ्याच्या शोधात निघालेले काही उन्मत हत्ती त्या गावात आले. पाणी प्यायला जाताना किंवा तळ्यात डुंबून मौजमजेत परत जाताना त्या हत्तींच्या बलदंड पायांखाली उंदरांची काही पिल्लं चिरडली गेली, काही जीव मेले; काहींचे हात पाय तुटले....
मग एके दिवशी सर्व उंदीर एकत्र आले अन् ह्या संकटावर काय उपाय काढायचा त्याचा ते विचार करू लागले. त्या सर्वांच्या बैठकीत एक विचार असा ठरला की, आपण आधी सांगून सवरून मैत्रीचा हात पुढे करून पाहू. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी उंदरांचा एक श्रेष्ठ प्रतिनिधी व काही म्हातारे उंदीर हे त्या हत्तीच्या वाटेवर त्यांना सामोरे गेले. प्रमुख उंदीर पुढे होत अन् हात जोडत त्या हत्तीच्या राजाला म्हणाला," महाराज गजराज, तुमचा जयजयकार असो. महाराज, आपण सारे जण रोज त्या तळ्यावर जाता येताना नकळत तुमच्या पायांखाली आमच्यातले काही उंदीर चिरडले जातात. आम्ही तर एवढे एवढेसे छोटे जीव. तुम्ही बलवान. तुमच्या पायांखाली आम्ही कसे टिकणार ? तेव्हा
एक छोटीशी विनंती आहे. करू काय ?" त्या धूर्त उंदराच्या स्तुतीनं सुखावलेला तो गजराज म्हणाला, विनंती आहे ?" बोला ! काय " महाराज... तुम्ही अन् तुमचा मित्र परिवार ह्यांचं आम्ही इथं खरं तर स्वागतच करतो. पण एक विनंती की, आपण एक मार्ग ठरवून घेऊ. तुम्ही त्या एका मार्गानं गेलात, तर मग कुणालाच त्रास नाही कसं ?" - हत्तीच्या राजाला ते मान्य झालं. त्यांनी उंदरांचा प्रस्ताव मान्य केला. दोघांच्यात एक नवा मैत्रीचा करार झाला.
सारे इटुकले पिटुकले धिटुकले उंदीर आनंदानं नाचू लागले. एका उंदराने एक छान सुंदर घंटा आणून ती गजराजाला भेट दिली. त्यात त्या उंदराची हुशारी दडली होती. दुसरे दिवशी ती भेट दिलेली घंटा गळ्यात घालून गजराज ताफा घेऊन आले... पण घंटेच्या आवाजानं त्या वाटेवरचे सर्व उंदीर दूर झाले. वाट मोकळी झाली. हत्तीसेना आली अन् गेली; पण एकही उंदीर त्यांच्या पायांखाली आला नाही. नव्या मार्गावरून हत्तीही मजेनं जाऊ लागले अन् सुरक्षित उंदीर आनंदानं नाचू-बागडू लागले. मैत्रीच्या एका सुरेख धाग्यानं दोघंही सुखावले.
एके दिवशी मात्र काय झालं, कळलं नाही; पण रोज येणारे हत्ती मात्र आले नाहीत. आता नाही, थोडे नंतर येतील, बसले असतील कुठे तरी छान हिरवा पाला खात... असा विचार सर्व उंदीर करू लागले, दुसऱ्या दिवशीही तेच... हत्ती मात्र आले नाहीत. तेव्हा त्या उंदरांना खरं तर बरं वाटलं. चला संकट टळलं. पण त्याच वेळी मैत्रीपोटी त्यांना हत्तींची काळजी वाटू लागली.. तोच...
तो म्होरक्या उंदीर पळत पळत गावात आला अन् म्हणाला, "मित्रांनो ! चला घात झालाय. आपले हत्ती शिकाऱ्यांच्या जाळ्यांत अडकले आहेत. एक मित्र संकटात असताना दुसऱ्याने त्याला मदत केली पाहिजे. खरं ना ? चला तर.. " अन् भली मोठी उंदीरसेना घेऊन तो म्होरक्या उंदीर तिकडे धावला. शिकाऱ्यांच्या जाळ्यांत अडकलेल्या त्या हत्तीच्या राजाला तो उंदीर म्हणाला, महाराज, थांबा, आम्हाला आमचं मित्रकर्तव्य करू द्या. आम्ही तुम्हाला मुक्त करतो...' " आणि सारेच्या सारे उंदीर जाळ्यांवर तुटून पडले.. जाळी कुरतडली अन् हत्ती मुक्त झाले.
तात्पर्य : सबळ असो किंवा दुर्बल; पण प्रत्येकालाच मित्र मात्र हवाच."
Tags:
बोधकथा